गोरेगाव गोकुळधाम मल:निस्सारण प्रश्‍न

 सर्वेक्षण करुन विभागीय मनपासमवेत तात्काळ आराखडा तयार करा

-जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या महापालिकेच्या अधिकार्‍यांना सुचना
- गोकुळधाम येथील विविध प्रलंबित प्रश्‍नी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसेच स्थानिकांसमवेत घेतली बैठक
मुंबई :  

गोरेगाव (पूर्व) गोकुळधाम येथील अन्य इमारतींमधील मल:निस्सारण लाईन मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य वाहीनीला जोडण्यासाठी पाहणी करुन मनपाच्या पी दक्षिण विभागीय कार्यालयाच्या सहकायाने सुनियोजित आराखडा तयार करावा, अशी सुचना जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना केली आहे. 

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व) येथील विविध रहिवाशांना भेडसावणार्‍या विविध प्रश्‍नी आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मंगळवारी मुंबई महानगरपालिकेचे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या समवेत गोकुळधाम येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला मनपाचे उपायुक्त मराठे, काजरेकर, कार्यकारी अभियंता सुशिल उभाळे, सहाय्यक अभियंता मंदार महींगडे, कार्यकारी अभियंता (रस्ते) संजय बोरसे, गोकुळधाम येथील रहिवाशी तसेच शिवसेनेचे उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, शाखाप्रमुख संदिप गाढवे, शाखा संघटक अपर्णा परळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

येथील काही इमारतींमधील मल:निस्सारण लाईन मनपाच्या मुख्य मल:निस्सारण वाहीनीशी न जोडता थेट गटारात सोडण्यात आले आहे. या नाल्यातील पाणी रस्त्यावर येत असल्याने या ठिकाणी मोठयाप्रमाणात दुर्गंध पसरत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी बैठकीत केली. त्याचबरोबर काही ठिकाणी गतीरोधक टाकण्यात यावे, काही वेळेला पाण्याचे प्रेशर मिळत नाही, पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साचते, अशा तक्रारी मांडल्या. 

गोकुळधाममध्ये २०१०-११ मध्ये मल:निस्सारण वाहीनी टाकण्यात आली होती.  मग इनलेट लाईन टाकण्याचे काम अद्याप पूर्ण का करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे येथील नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतींची मल:निस्सारण वाहीनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य वाहीनीला का जोडण्यात आली नाही. वाढीव मल:निस्सारण वाहीनी टाकण्यात आली नसेल तर संबंधित विभागाने अद्याप तसा प्रस्ताव का तयार केला नाही? असे प्रश्‍न महापालिकेच्या अधिकार्‍यांना विचारले. आता जास्तवेळ न घालवता महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी मल:निस्सारण वाहीनीचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी पाहणी करुन पी दक्षिण विभागातील अधिकार्‍यांच्या सहकार्याने तात्काळ आराखडा तयार करुन यातून मार्ग काढून जनतेला दिलासा द्यावा, अशी सुचना वायकर यांनी यावेळी केली. 

तसेच जनतेच्या मागणीनुसार शॉपिंग मॉल, शाळा तसेच हॉस्पिटल या ठिकाणी पाहणी करुन गतीरोधक बसवावेत. त्याचबरोबर या भागात ज्या ठिकाणी स्ट्रॉम वॉटर ड्रेन नसतील त्याची देखील पाहणी करुन प्रस्ताव तयार करावा, ही कामे वेगाने पुर्ण केल्यास, येथील ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत आहे, त्या ठिकाणवरील रहिवाशांना दिलासा मिळेल. आमदार तसेच माजी राज्यमंत्री वायकर यांच्या सुचनांची दखल घेत मनपाचे उपायुक्त मराठे यांनी, येथील ज्या भागांमध्ये अद्याप मल:निस्सारण वाहीनी टाकण्यात आली नाही, त्या ठिकाणांचे सर्वेक्षण करुन वाहीनी टाकण्यात यावी, अशी सुचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना केली.  

Comments

Popular posts from this blog

LG unveils its SIGNATURE series in India

“Hellmann’s #TastebudsApproved Sandwiches Now Served in Minutes via Zepto Café”

"आत्म ज्ञान बिना सब कर्म निरर्थक" - महात्मा अंबालिका बाईजी